Tuesday, September 30, 2014

झी २४ तास नेत्रदान मोहीम

२२ नोव्हेंबर २०१३
नेत्रदान मोहिमेला उदंड प्रतिसाद
अवघ्या 4 दिवसांत 1 लाख नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प

एकापेक्षा एक समाजसेवी उपक्रम राबवणा-या झी 24 तासने यंदा अनोखा विक्रम केलाय... सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या झी 24 तासच्या नेत्रदान मोहीमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. अवघ्या 4 दिवसांमध्ये 1 लाखाहून अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडलाय... या उदंड प्रतिसादाबद्दल झी मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर दास यांनी कौतुक केलं.

नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश जनमानसात रूजवण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह राज्याच्या विविध भागांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. विविध रेल्वे स्थानकांवर तसेच शहरांतील मोक्याच्या ठिकाणी नेत्रदान करू इच्छिणा-या व्यक्तींसाठी अर्जांचे वाटप सुरू असून, अवघ्या चार दिवसांतच 1 लाखाहून अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यामध्ये तरूणांपासून अगदी वयोवृद्ध नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. गेल्यावर्षी या मोहीमेअंतर्गत सुमारे दीड लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला होता. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, यंदा ही संख्या 5 लाखाच्या घरात पोहोचेल, अशी आशा झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.

झी 24 तासने समाजसेवी उपक्रमांची आपली परंपरा सुरूच ठेवली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, वसा भगीरथाचा ही मोहीम झी 24 तासने राबवली. दुष्काळ निवारणासाठी विविध चांगले प्रयोग राबवणा-या असंख्य भगीरथांना झी 24 तासने जगासमोर आणले. त्यानंत पाणी वाचवूया... आणि पक्षी वाचवूया... असे उपक्रम राबवण्यात आले. दिवाळीच्या काळात होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी यंदा मिशन दिवाळी हा खास उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्राच्या विविध भागांतील लाखो विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेतली. आता नेत्रदान मोहीमेलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


इंदू मिल स्मारकाचं राजकारण

२२ नोव्हेंबर २०१३
इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी अशी धुमश्चक्री सुरू झालीय. स्मारक उभारण्यामध्ये मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते विजय कांबळे यांनी आज इंदू मिल परिसरात आंदोलन केलं. काय आहे इंदू मिल स्मारकामागचं राजकारण, पाहूया एक विशेष रिपोर्ट....
...........

चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्यावर्षी केली. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी एनटीसीच्या ताब्यातील मिलची साडेबारा एकर जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. बाबासाहेबांच्या चैत्यभूमीजवळच असलेल्या इंदू मिलमध्ये स्मारक होणार म्हणून भीमबांधवांना मोठा आनंद झाला. फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून त्यांनी जल्लोष केला... परंतु गेल्या वर्षभरात बाबासाहेबांच्या स्मारकाची एक वीटही उभारण्यात आली नाही. स्मारकाचा प्रश्न वितभरही पुढे सरकलेला नाही.

महाराष्ट्र सरकार केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत असल्यानं आंबेडकरी अनुयायांचा संताप झाला. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीमसैनिकांनी इंदू मिल परिसरात आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने इंदू मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा फौजफाटा जमवला होता. अखेर कांबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच स्मारकाला विलंब होत असून, ते राजकारण करत असल्याचा आरोप विजय कांबळे यांनी केलाय.

(बाइट - विजय कांबळे)

एवढ्यापुरतंच हे राजकारण मर्यादित नाहीय... तर स्मारकाचं श्रेय उपटण्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांसोबतच रिपब्लिकन पक्षाचे नेतेही आघाडीवर आहेत. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकरांचं स्मारक करावं, या मागणीसाठी सामाजिक समता मंचच्या वतीने १९९८ पासून आंदोलनं सुरू झाली. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही 6 डिसेंबर 2011 रोजी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलच्या जागेचा कब्जा घेतला होता. तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही स्मारकाची मागणी लावून धरली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा बैठका घेऊन, या मागणीचा पाठपुरावा केला. आता हेच नेते एकमेकांवर दोषारोप करण्यात धन्यता मानतायत...

(फोनो - आनंदराज आंबेडकर)
(फोनो - रामदास आठवले)

व्हिओ -
आता 6 डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणदिन जवळ आल्यानं पुन्हा एकदा आंदोलनांचं पेव फुटलं आहे... श्रेय लाटण्याऐवजी आंबेडकर अनुयायांनी स्मारक लवकरात लवकर व्हावं, यासाठी एकत्रित लढा देण्याची वेळ आली आहे...


विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा

२१ नोव्हेंबर २०१३
खासगी स्कूल बसमधून प्रवास करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, बेस्टच्या निमसरकारी बसमधून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय, असा आणखी नवा सवाल उपस्थित केला जातोय...

व्हिओ -
खासगी स्कूल बसमधून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवी नियमावली बनवलीय... खासगी स्कूल बसचालकांनी काय सुरक्षा उपाय योजावेत, हे सरकारनं निश्चित केलंय. परंतु हजारो विद्यार्थी दररोज बेस्टच्या बसेसमधून प्रवास करतात. खासगी बसेसप्रमाणे बेस्टच्या बसेसना सुरक्षेचे नियम का लागू करत नाही, असा नवाच मुद्दा आता ऐरणीवर आलाय...

(बाइट- दिपक नाईक, सचिव, खाजगी बस संघटना)

व्हिओ -
बेस्टच्या बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास किती सुरक्षित आहे, याचा आढावा झी मीडियानं घेतला... त्यावेळी काही बसमध्ये अग्निशमन यंत्रंच नाहीत. काही बसमध्ये यंत्र आहेत, पण स्टिकर खराब झाल्याने ती कधीपासूनची आहेत, ते कळायला मार्ग नाहीत. बेस्ट बसमध्ये प्रथमोपचार पेटी नाही. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी खासगी बसमध्ये महिला अटेंडंट तैनात करण्याची सक्ती करण्यात आलीय. परंतु बेस्टच्या कुठल्याच स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी नाहीत. खिडक्यांना एक किंवा दोन रॉड आहेत. याउलट खासगी बसेसना 4 रॉड कंपलसरी आहेत. शिवाय बेस्टचे दोन्ही दरवाजे सताड उघडे असतात. याबाबत पालक-शिक्षक संघटनेने देखील जोरदार आक्षेप घेतलाय.

बाइट- अरुंधती चव्हाण, अध्यक्ष, पालक-शिक्षक संघटना

व्हिओ -
बेस्टच्या बसमधील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित असल्याचा दावा बेस्टनं केलाय... बेस्टची बस रिजनल ट्रांसपोर्ट ऑथॉरीटीच्या नियानुसार चालते. शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. शिवाय बेस्ट कर्मचा-यांकडून विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं, असा युक्तिवाद बेस्टकडून करण्यात आलाय.

मात्र, खासगी स्कूल बससाठी वेगळे नियम आणि बेस्ट स्कूल बससाठी वेगळे नियम असा भेदाभेद का? बेस्टमधून प्रवास करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील मुख्याध्यापकांनाच उचलावी लागणार का ? बेस्टसाठी स्वतंत्र नियमावली का केली नाही? या प्रश्नांची उत्तरे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी द्यायला हवीत.

पीटीसी - दिपाली जगताप (खासगी स्कूल बस आणि बेस्टच्या शाळेसाठीच्या बसेस यांच्या नियमांमध्ये मोठी तफावत असल्याने नव्य़ा वादाला सुरुवात झालीय. त्यामुळे बेस्टमधून प्रवास करण-या विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण होतो)


'शिकारी' तरूण तेजपाल

२१ नोव्हेंबर २०१३
स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेकांची शिकार करणारे 'तहलका'चे पत्रकार तरूण तेजपाल यावेळी स्वतःच 'शिकार' बनलेत... तेजपाल यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप तहलकामध्येच काम करणा-या एका महिला पत्रकाराने केलाय... गोवा पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केल्यानं तेजपाल गोत्यात आलेत...
.................

व्हिओ -
तहलकाचे एडिटर इन चीफ तरूण तेजपाल यांनी आणखी एक 'तहलका' घडवलाय... स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर करोडो रूपयांचे घोटाळे उघडकीस आणले. भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, द्रमुकचे माजी मंत्री दयानिधी मारन, माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर अशा अनेकांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश तेजपाल यांनी केला... परंतु त्यांच्याच तहलका मॅगझिनमध्ये काम करणा-या एका महिला पत्रकाराने तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केलाय... त्यामुळे मोठी खळबळ उडालीय.

(बाइट - महिला पत्रकार बाइट)

व्हिओ -
लैंगिक शोषणाची शिकार ठरलेल्या महिला पत्रकाराने तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली. 10 दिवसांपूर्वी गोव्यातील एका हॉटेलमध्ये तहलका मॅगझिनच्या एका बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याची तिची तक्रार आहे. मात्र या तक्रारीची तहलका व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली नाही, अशी व्यथा महिला पत्रकाराने मांडलीय. हा गलिच्छ प्रकार उघड झाल्यानंतर तरूण तेजपाल यांनी स्वतःच सहा महिन्यांसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परंतु नैतिकतेची 'लक्ष्मणरेषा' ओलांडणारे तेजपाल स्वतःच कशी काय शिक्षा ठरवू शकतात? त्यांना अटकच झाली पाहिजे, अशी मागणी महिला कार्यकर्त्यांकडून केली जातेय. राष्ट्रीय महिला आयोगही यामध्ये गांभीर्याने लक्ष घालणार असल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय...

(बाइट - निर्मला सामंत
किरण बेदी
मिनाक्षी लेखी
कविता कृष्णा)

व्हिओ -
त्यातच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेत. गोवा पोलिसांनी त्यानुसार तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवलंय. एवढंच नव्हे तर ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी मागवलंय...

(बाइट - मनोहर पर्रीकर किंवा गोवा पोलीस)

व्हिओ -
स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जगाला नैतिकतेचे डोस पाजणारे तरूण तेजपाल यांचा बुरखा टराटरा फाडला गेला असून, त्यांचा खरा चेहरा जगासमोर आलाय... शिकारी खुद यहाँ शिकार हो गया...

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया


व्हिक्टोरिया घोडागाडी बंदी

२० नोव्हेंबर २०१३
व्हिओ १ -
मुंबईच्या रस्त्यावर १५० वर्षापासून धावणारी व्हिक्टोरीया पर्यटकांचं मनोरंजन करतेय... परंतु या घोडागाड्यांचे चालक-मालक आपलं पोट भरण्यासाठी मुक्या घोड्यांवर अमानुष अत्याचार करतात, अशी प्राणीप्रेमींची ओरड आहे. त्यामुळंच घोडागाड्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पेटा या प्राणी मित्र संघटनेनं  केलीय. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिनं मुंबईच्या महापौराची भेट घेऊन त्यासाठी गळ घातली.

(बाईट -  जॅकलीन फर्नांडिस,बॉलीवूड स्टार )

व्हिओ -
परंतु पेटाच्या आरोपांचा घोडागाडी चालक-मालकांनी खंडन केलंय... आपला व्यवसाय वाचवण्यासाठी चालक-मालकांनीही महापौराची भेट घेतली. आमचे घोडे ताब्यात घेऊन, हे घोडे पेटावाले विकतात, असा गंभीर आरोप घोडागाडी बचाव आंदोलनाने केलाय..

बाईट - ग्रेगरी डिसोझा,घोडागाडी मालक
इंदू पलानी,घोडागाडी मालक

व्हिओ -
याप्रकरणी कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलंय....

(बाइट - सुनील प्रभू,महापौर मुंबई)

व्हिओ -
मुंबईचं वैभव असलेल्या या ऐतिहासिक घोडागाड्यांना व्हिक्टोरिया राणीनं लायसन्स दिली होती. या घोडागाड्यांवर बंदी घालावी. परंतु त्यांच्या पुनर्वसन पॅटर्नबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. या पार्श्वभूमीवर पेटा विरूद्ध व्हिक्टोरियावाले हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

हजारे केजरीवाल वाद आणि मीडिया

२० नोव्हेंबर २०१३
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात सध्या तू तू मै मै रंगली असताना, अण्णा हजारे मात्र सगळे खापर मीडियावर फोडून मोकळे झालेत... राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तर मीडिया लोकशाही खराब करत असल्याचा ठपका ठेवलाय...
.............

(मीडिया झगडे लगा रहे है... अशा आशयाच्या अण्णा हजारेंच्या बाइटने पॅकेजची सुरूवात करावी...)

व्हिओ -
देशातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, असे दोन महापुरूष म्हणजे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल... अण्णा आणि केजरीवाल यांच्यात सगळंच आलबेल आहे... त्यांच्यात कसलंही भांडण सुरू नाहीय... अरविंद केजरीवाल हे आपल्या नावाचा गैरवापर करत असल्याचं पत्र अण्णांनी पाठवलंय आणि केजरीवालांनी त्याचा इन्कारही केलाय.. पण तरीही त्यांच्यात भांडणं नाहीयत... परंतु मीडियावाले त्यांच्यामध्ये भांडणं लावून देतायत... हा साक्षात्कार आज झालाय अण्णा हजारेंना...

या आघाडीवर अण्णा एकटेच नाहीत... राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही काल औरंगाबाद मुक्कामी मीडियावर तोंडसुख घेतलं...

(बाइट - भास्कर जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

व्हिओ -
अण्णा काय किंवा भास्कर जाधव काय, जेव्हा अडचणीची वेळ येते, तेव्हा मीडियावर दोष ढकलून मोकळं व्हायचं, हा फंडा चांगला आहे.. ग्रामसुधारणा करणा-या अण्णांनी आता मीडिया सुधारणेचं कार्य हाती घ्यायला हरकत नाही... अण्णांच्या नापासांच्या शाळेत आता पत्रकारांना प्रवेश द्यायला हरकत नसावी.. भास्कर जाधवांना आपल्या जिल्ह्यातच राष्ट्रवादी नेत्यांना सांभाळून घेता येत नाहीय... अलिकडच्या काळात अण्णांच्या लोकप्रियतेलाही ओहोटी लागलीय... म्हणूनच तर मीडियावर ही टीका होत नाहीय ना..?

स्कूल बस नवी नियमावली

२० नोव्हेंबर २०१३
स्कूल बसच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवीन नियमावली लागू करताना, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता मुख्याध्यापकांकडे सोपवलीय. मात्र मुख्याध्यापकांनी त्यास विरोध केला असून, या विरोधात मुख्याध्यापक कोर्टातही जाणार आहेत.

वीओ 1 -

शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणा-या स्कूल बसला होणारे अपघात, त्यामध्ये चिमुरड्यांच्या जीवाशी होणारा खेळ आणि अशा अपघातांमध्ये गेलेले निष्पाप बळी... या पार्श्वभूमीवर स्कूल बसच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केलंय... त्यामध्ये शाळा व्यवस्थापनाच्या जबाबदा-या निश्चित करण्यात आल्यात... त्यानुसार,
GFX IN
प्रत्येक शाळेने परिवहन समिती स्थापन करावी.
समितीमध्ये शिक्षक, पालक, वाहतूक पोलीस निरिक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी असेल. समितीचे प्रमुख शाळेचे प्राचार्य असतील.
समितीची दर सहा महिन्याला बैठक होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यी शाळेत येताना-जातानाची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.
विद्यार्थ्यांना प्रथमउपचार पेटी आणि अग्निशमन यंत्रणेचं प्रशिक्षण वर्षातून दोन वेळा दिलं गेलं पाहिजे.
GFX OUT

व्हिओ -
त्याशिवाय स्कूल बस चालकांवरही अनेक बंधने घालण्यात आलीत...
GFX IN
त्यानुसार बस मालकाने प्रत्येक बसमध्ये एक महिला नेमली पाहिजे.
बसमधील कर्मचा-यांनी गणवेश आणि ओळखपत्र घालणे गरजेचे आहे.
बस चालकाने आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र काढणे बंधनकारक आहे.
बसमध्ये 5 किलो क्षमतेची दोन अग्निशमन उपकरणं बसवणे बंधनकारक आहे.
GFX OUT

व्हिओ -
यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक महत्व देण्यात आलं असून त्याची सर्व जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर टाकण्यात आलीय. परंतु या निर्णयाला मुख्याध्यापकांनी जोरदार विरोध केलाय.

(बाइट- प्रकाश रेडजी, प्रवक्ते, महा.राज्य मुख्याध्यापक संघटना महामंडळ)

व्हिओ -
हे कमी झालं म्हणून की काय, आता सरकार दरबारीही या निर्णयावरून गोंधळाचीच परिस्थिती आहे. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव नाना रौराळे यांनी हा जीआर काढला असला तरी, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना त्याबाबत काहीच माहिती नाहीय. परिवहन विभागाने आपणाला न विचारताच निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्री सांगत आहेत...

स्कूल बसच्या नावाने एकूणच सगळा सावळागोंधळ सुरूय... अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार तरी कोण..? हा सवाल कायमच आहे.

कसाब फाशी... 'ऑपरेशन एक्स'

२० नोव्हेंबर २०१३
दहशतवादाचा चेहरा ठरलेला क्रूरकर्मा कसाबला फाशी देऊन आज एक वर्ष पूर्ण झालं... मुंबईवर दहशतवादी हल्ला करणा-या कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली आणि देशात एकच खळबळ उडाली. कसाबच्या फाशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. काय होतं हे 'ऑपरेशन एक्स'... झी मीडियाचा हा स्पेशल रिपोर्ट....
...................


GFX IN
तारीख़ - २१ नोव्हेंबर २०१२
वेळ - सकाळी ७ वाजून ३० मिनिटे
'ऑपरेशन एक्स' यशस्वी
क्रूरकर्मा कसाबला दिली फाशी
GFX OUT

व्हिओ १ : गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला सकाळी साडेसात वाजता सर्वच न्युज चॅनलवर ही ब्रेकिंग न्यूज झळकली आणि संपुर्ण देशात एकच खळबळ उडाली...

पीटीसी : अजित मांढरे (( ११ संप्टेंबर २०१२ ला कसाबला फाशीची शिक्षा कोर्टानं सुनावली ही फांसीची शिक्षा २१ नोव्हेबंर २०१२ ला येरवडा जेल मध्ये सकाळी सात वाजता देण्यात यावी हे ही निश्चित झालं. पण २१ नोव्हेबंरला ७२ दिवस अवकाश होता. या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आॅपरेशन एक्स ची योजना आखली गेली ))

व्हिओ २ : या आॅपरेशन एक्सचा भाग होते स्वतः गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबई पोलीस दलातील निवडक अधिकारी, येरवडा जेलचे अधिकारी व कर्मचारी आणि न्यायालय. या सर्वांना त्यासाठी गोपनियतेची शपथ देण्यात आली होती. पण मुळात या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्यांपैकी अनेकांना हे माहितचं नव्हतं की ते ज्या ऑपरेशनचा भाग आहेत, ते नेमकं आहे तरी काय? कारण कसाबच्या फाशी प्रकियेत अडथळा येऊ नये यासाठी ही कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

पीटीसी : (या आॅपरेशन एक्स मध्ये सर्वात महत्वाच काम होतं ते म्हणजे कसाबला मुंबईहून पुण्याला नेणं. त्यातच १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेचं निधन झालं. सर्व मिडीया आणि जगाचं लक्ष बाळासाहेबांच्या बातमीकडे होतं, हीच वेळ साधून १७ तारखेला रात्री पाऊण वाजता आर्थररोड जेलमधून तुरळक सुरक्षेसह पुण्याला रवाना केलं गेलं.)

व्हिओ ३ : पण, अजूनही कसाबच्या फाशीमधले अडथळे संपले नव्हते. पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये १९९५ नंतर कोणालाही फाशी देण्यात आली नव्हती. त्यामुळे फाशीचा दोर बनवण्यापासून ते कसाबच्या अंत्यविधासाठी लागणारा मौलवी या सर्वांची जुळवाजुळव करावी लागली. कोणालाही ऑपरेशन एक्सची चुणूक कुणाला लागू द्यायची नव्हती. त्यामुळं फाशी कशी देतात, याचं ट्रेनिंग कर्मचा-यांना द्यायचंय, अशी नोटीस काढण्यात आली. कसाबला दफ़न करण्यासाठी खोदण्यात येणारा खड्डा वीजेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी खोदण्यात येतोय असं सांगण्यात आलं. कसाबला फाशी देताना इतकी गुप्तता पाळण्यात आली होती की, फाशीसाठी आलेल्या मॅजिस्ट्रेटना देखील कसाबला फाशी देण्यात येणारंय हे माहित नव्हतं.

पीटीसी : पुणे रिपोर्टर (( २६ नोव्हेबंर २००८ साली कसाबला पकडल्यापासून ते कसाबला फाशीसाठी नेईपर्यंत त्याने आपल्याकडून चुक झालीये असं कधीच म्हणटलं नाही. पण, ज्यावेळी बुरखा घालून कसाबला फाशी देण्यासाठी रँम्पवर नेण्यात आलं त्यावेळी कसाबचे पाय लटपटू लागले, " मुझे माफ़ कर दो । मैं दोबारा एेसे नहीं करुंगा । मेरी छोटी बहन है, मेरा परिवार है। असं तो बोलूँ लागला... कारण शेकडो जणांचे प्राण घेणार्यांना कसाबला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता))



साहित्य संमेलन अध्यक्ष करतात काय?

१६ ऑक्टोबर २०१३
मोठ्या लटपटी आणि खटपटी करून मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवल्या जातात... त्यात विजयी होणारे वर्षभरासाठी अध्यक्ष म्हणून मिरवतात.. पण पुढं काय? मराठी साहित्याचा अभ्यास करणारेही त्यांना ओळखत नाहीत... मराठी सारस्वतांच्या कारभारावर ढळढळीत प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
..................

व्हिओ -
समजा 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात 7 कोटी रूपयांसाठी अमिताभ बच्चन यांनी हा शेवटचा प्रश्न विचारला... 2011 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण...? तर हॉट सिटवर बसलेल्या स्पर्धकाचीच काय, टीव्हीवर कार्यक्रम पाहणा-या कुणाचीही बोबडीच वळेल... अगदी 7 कोटी रूपयांसाठी मराठी साहित्याशी संबंधित प्रश्न विचारल्याबद्दल गर्वाने छाती फुगलेल्या मराठी रसिकांनाही कदाचित ते आठवणार नाही.. कारण मराठी साहित्य संमेलन का होतं, कुठे होतं आणि त्याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं, हे कितीजणांना अचूक सांगता येईल, हा प्रश्नच आहे. अगदी स्मरणशक्तीला कितीही ताण दिला तरी उत्तर सापडता सापडणार नाही...

एक ट्रायल म्हणून आम्ही हा प्रश्न कला शाखेचा अभ्यास करणा-या बीए मराठीच्या विद्यार्थ्यांना विचारला... तेव्हा काय उत्तरं मिळाली, ते पाहा...

(बाइट - विद्यार्थ्यांचे बाइट्स)

व्हिओ -
ही आहे मराठी साहित्यिकांची दारूण वस्तुस्थिती... तरीही मराठी सारस्वतांच्या दरबारात साहित्य संमेलन अध्यक्षपद मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो... साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीचीच प्रक्रिया एवढी गुंतागुंतीची आहे की, भलेभले साहित्यिक त्या मांडवात फिरकतच नाहीत. अगदी राजकारण्यांनीही कोचिंग क्लासेस लावावेत, अशा पद्धतीनं साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवल्या जातात आणि जिंकल्याही जातात... त्यामुळंच की काय, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, ना. धों. महानोर, भालचंद्र नेमाडे, रा. चिं. ढेरे यांच्यासारखे मान्यवर साहित्यिक संमेलन अध्यक्षपदाच्या भानगडीतच पडायचे टाळतात...

गेल्या पाच वर्षांत नागनाथ कोतापल्ले, वसंत डहाके, उत्तम कांबळे, . भि. कुलकर्णी, आनंद यादव हे साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाले आणि गेले... पण आज ते कुणाच्याही लक्षात नाहीत... हीच का शान मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची..?

पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई


'लालबागचा राजा', नवसाची रांग आणि मी...

९ सप्टेंबर २०१३
गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला...
पण 'लालबागचा राजा'च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
राजाच्या मंडपापासून जवळपास दीड किमी अंतरावर आमची बिल्डिंग आहे. साधारणपणे गणेशोत्सवाच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी ही नवसाची रांग बिल्डिंगपर्यंत पोहोचते. पण यंदा गणेश चतुर्थीच्या आदल्याच दिवशी गं. . आंबेकर मार्गावर राजाच्या भक्तांची नवसाची रांग अॅनाकोंडाच्या शेपटासारखी पसरली होती...
आता याला श्रद्धा म्हणायची की, अंधश्रद्धा..?

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेशाचे नाव घेऊन करावी, ही झाली श्रद्धा...
पण नवसाला पावतो म्हणून 'लालबागचा राजा'च्या रांगेत, 10-15 तास तिष्ठत उभं राहायचं, ही अंधश्रद्धाच झाली...
गणपती म्हणजे गणपती... मग तो लालबागचा राजा असो, गणेशगल्लीचा असो, सिद्धीविनायक असो, नाही तर घराजवळच्या छोट्याशा मंदिरातला असो... देवापुढे नमस्कार करावा, हात जोडावेत, अगदी नतमस्तक व्हावे, इथपर्यंत ठिक आहे. पण देवाकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी तासन् तास असं रांगेत उभं राहणं, याला भोळेपणा नाहीतर दुसरं काय म्हणायचं..?

आश्चर्याची बाब म्हणजे अगदी तान्हुल्या बाळांसह, लहानग्या कच्च्यांबच्चांसह कुटुंबंच्या कुटुंब रांगेत उभी होती. त्यात तरूण-तरूणींची संख्याही लक्षणीय होती. सध्याची तरूण पिढी वाया गेलीय, अशी सार्वत्रिक ओरड केली जाते. त्यामुळे रांगेतली तरूण-तरूणींची संख्या पाहून कुणाला तरी पोरं सुधारतायत, असं वाटू शकेल. पण मला वाटतं की, ही उलट जास्त चिंतेची बाब आहे. 'लालबागचा राजा'पुढं नवस केला, तर तो पावतो, ही त्यांची मानसिकता फारच चिंताजनक आहे. 'प्रयत्नार्थी परमेश्वर,' असं म्हटलं जातं. पण ही यंग जनरेशन प्रयत्नांची कास सोडून, तासन् तास रांगेत उभं राहत असेल तर नक्कीच काहीतरी 'केमिकल लोचा' आहे...

मी नास्तिक वगैरे नाही... देव नावाची संकल्पना मला देखील मान्य आहे. पण देव एखाद्या विशिष्ट मूर्तीमध्ये किंवा मंदिरामध्येच राहतो, यावर माझा तरी विश्वास नाही. देव हा चराचरात व्यापलेला आहे. निसर्गात आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसातही आहे... मग नवसाच्या रांगेत उभं राहण्याची गरजच काय? मी डोळे मिटले, मनोभावे हात जोडले की माझा नमस्कार देवापर्यंत पोहचायलाच हवा... त्यासाठी प्रसाद, पेढे, हारतुरे, नारळ यांची गरजच काय? एखादं काम व्हावं, म्हणून प्रयत्न करायचे सोडून नवसाच्या रांगेत उभं राहायचं... केवळ नवस करायचा नाही, तर तो पूर्ण झाला तर अमूकतमूक किलो लाडू-पेढे वाहिन, अशी लालूच थेट देवाला दाखवायची... म्हणजे फारच झालं. देवाच्या दरबारात म्हणजे मंदिरात जायचं तर पवित्र मनाने आणि शरीराने जायचं... स्वच्छ स्नान करून देवापुढे प्रसन्न मनानं जायचं असतं... असे संस्कार आपल्यावर असतात. पण नवसाच्या रांगेत 10-15 तास उभे राहणारे, गर्दीत धक्केबुक्के खाणारे, टेम्पररी प्रसाधनगृहांमध्ये शी-सू करणारे, रात्रभर रांगेत पेंगा काढणारे हे 'नवसाच्या रांगेतले भाविक' आंघोळ वगैरे न करताच लालबागचा राजाच्या चरणी मस्तक कसे ठेवू शकतात, याचेही राहून राहून आश्चर्य वाटते.

मला आठवतं, लहान असताना आम्ही मार्केटचा राजा पाहायला जायचो... तेव्हा मार्केटचा राजा अशीच त्याची ओळख होती, तो 'लालबागचा राजा' झालेला नव्हता... अगदी दहा-पंधरा मिनिटांत त्याचं दर्शन व्हायचं... मार्केटमधली व्यापारी मंडळी तेव्हा भक्तांना निरमाच्या छोट्या पॅकेटमधल्या पावडरी वाटायचे... जाहिरातीसाठी. फुकट सरबत पाजायचे. जाहिरातीसाठी. आणि तिथून मग गरमखाड्यातली जत्रा पाहण्यासाठी आम्ही जायचो... तिथं एक रूपया टाकला की, सोंडेतून एक मोठा कडक बुंदीचा लाडू देणारा गणपती असायचा... खेळणी असायची, खाऊची दुकानं असायची, थम्स अप-कोल्याचे स्टॉल असायचे... पण या नवसवाल्यांच्या आणि मंडळवाल्यांच्या कृपेने गेल्या काही वर्षांत ती सगळी गम्मतच हरवून गेली. हल्ली नवसवाले भाविक जसे वेगळे, तसे मुखदर्शनवाले भाविकही वेगळे झालेत. गरमखाड्याच्या मैदानात आता जत्रा भरत नाही, तिथं भाविकांच्या रांगांची गोलगोल वेटोळी केलेली असतात. गेल्या पाच-सहा वर्षांत मी तरी या गर्दीच्या जंजाळात गेलेलो नाही, पण इथं म्हणे एसीच्या एसी लावलेले असतात. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून कूलर असतात. रात्रभर रांगेत उभे असणा-यांना चहापानाची आणि मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते.
चांगभलं... मार्केटचा राजा आता मार्केटिंगचा राजा झालाय तर...

नवसाची रांग, मुखदर्शनाची रांग... तशी आणखी एक रांग हल्ली इथं दिवसरात्र ओसंडून वाहत असते... सेलिब्रिटींची रांग !!!
'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींची रीघच लागलेली असते. कुणी म्हणतं की, या व्हीव्हीआयपींना मंडळवालेच निमंत्रण पाठवून बोलवतात... कुणी सांगतं की, या व्हीव्हीआयपींनाही लालबागचा राजा पावलाय म्हणून... नवस फेडण्यासाठी ते दरवर्षी न बोलवता येत असतात. मग या व्हीव्हीआयपींना थेट स्टेजवर एन्ट्री कशी देतात..? सामान्य भक्तांप्रमाणं त्यांना का नाही नवसाच्या रांगेत किंवा मुखदर्शनाच्या रांगेत उभं करतं..? की देवाच्या दरबारात व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना वेगळा प्रोटोकॉल असतो..? एरव्ही सिद्धीविनायकाला जाणारे हे सेलिब्रिटी गणेशोत्सवाच्या काळात मात्र 'प्रसिद्धीविनायका'च्या दरबारात हजेरी लावतात. या सेलिब्रिटींसाठी दहा-दहा मिनिटे नवसाची रांग थांबवली जाते... म्हणजे राजाच्या दरबारात सामान्य भक्तांसाठी एक न्याय आणि व्हीव्हीआयपींसाठी दुसरा न्याय.
हा भेदाभेद 'लालबागचा राजा'ला चालतो..?

हे सेलिब्रिटी, व्हीव्हीआयपी भक्त म्हणे हजारो-लाखो रूपयांचे दागदागिने राजाच्या चरणी अर्पण करतात. म्हणजे मर्सिडीज बेन्झमधून येणारे हे भाविक राजाला सोन्याचा मुकूट वाहणार, अंगठ्या देणार, दागदागिन्यांनी मढवणार... पण गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या भिका-याच्या कटोरीत एक रूपयाचे नाणेही टाकणार नाहीत. राजाला सोन्याचांदीची भेट दिली की, आपली सगळी पापे धुतली जातील, अशी बहुतेक त्यांची श्रद्धा असावी. नवसाच्या रांगेत उभं राहणा-यांची श्रद्धा वेगळी... आणि बाप्पाच्या पापभिरू सेलिब्रिटी भक्तांची श्रद्धा निराळी...
मस्तच.

माझे बरेच मित्र लालबागला राहतात. शाळेत असताना हेच मित्र आम्हाला पाठच्या गेटने गणेशगल्ली किंवा 'लालबागचा राजा' गणपती दाखवायचे... पण आता त्यांचाही नाइलाज झालाय. 'लालबागचा राजा'जवळ राहणा-या मित्रांची तर एवढी वाईट अवस्था आहे की, बिच्चा-यांना स्वतःच्या घरी जाण्यासाठी पास काढावा लागतो... शंभर ठिकाणी पोलिसांना पास दाखवावा लागतो, तेव्हा कुठे त्यांना स्वतःच्या घरी एन्ट्री मिळते. काय बोलायचं याला..? पण ही मंडळीही अजिबात कुरबुर करत नाहीत. उलट हल्ली भाव खाऊन असतात... कारण गणेशोत्सवाच्या काळात सगळेजण त्यांना शोधत असतात. रांग न लावता, गणपती पाहायला मिळावा यासाठी त्यांच्या मागे मित्रांचा, नातेवाईकांचा, ऑफिसमधल्या सहका-यांचा ससेमिरा लागलेला असतो. या मित्रांनाही त्यात मोठेपणा मिरवायला मिळतो. मी तर बाबा या धबडग्यात 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला जातच नाही... पण आमच्या ओळखीतल्या एका नातेवाईकाला दोन वर्षांपूर्वी 'लालबागचा राजा' पाहायचा होता. मी माझ्या मित्राला फोन केला... पण या पठ्ठ्याने अनंत चतुर्दशीपर्यंत फोन काही उचलला नाही. अनंत चतुदर्शीनंतर तो स्वतःच माझ्या घरी आला. दहा-बारा नारळ घेऊन... म्हणाला, 'लालबागचा राजाचा प्रसाद आहे.' मी म्हटलं, 'अरे पण फोन का नाही उचलत होतास?' तर म्हणाला, 'त्या काळात सगळे गणपती पाहायचाय म्हणूनच फोन करतात... कितीजणांना गणपती दाखवायचा? माझ्या बॉसला आणि त्याच्या बायकोला मात्र न चुकता 'लालबागचा राजा'च्या पायावर घालतो... मग दहा दिवस निर्विघ्नपणे सुट्टी सँक्शन होते आणि बॅच लावून मिरवायलाही मिळते...'
त्याची ही गण'सेवा' पाहून मी फक्त त्याला हात जोडले...

मी जात नाही, तरीही 'लालबागचा राजा' मला भेटतोच... पेपर वाचायला घेतला तर 'लालबागचा राजा'... टीव्हीवर बातम्या पाहायच्या तर 'लालबागचा राजा'... घरच्या केबल टीव्हीवर तर 24 तास त्याचे दर्शन होत असते. अनंत चतुर्दशीला श्रॉफ बिल्डिंगजवळची पुष्पवृष्टी पाहायला लहानपणी आईवडिलांबरोबर जायचो... आता मी माझ्या मुलाला घेऊन जातो... तिथंही 'लालबागचा राजा' दिसतो. पावलापावलावर राजा मला भेटत असतो... दर्शन देत असतो...
रस्त्यावर नवसाच्या रांगेत उभं राहणारांची मग मला कीव येते... चीड येते...